इतिहासातील चमत्कारिक नोंदी



इतिहास म्हणजे राजकारण व लढाया हा निव्वळ गैरसमज ! कागदपत्रांतून नव्या गोष्टींचा उलगडा होत जातो. इतिहासाचा अभ्यास करताना कागदपत्रात विविध नोंदी मिळतात. त्या बरच काही शिकवतात, वेगळा दृष्टीकोन देतात, कधीकधी हसवतात देखील. आता आपण काही नोंदी पाहणार आहोत. त्याकाळातील लोकांस काही वेगळेपण जाणवले, म्हणून त्यांनी ते लिहिले असावे. ह्या नोंदी चमत्कारिकच आहेत. आजच्या काळात सुद्धा एखादी विलक्षण गोष्ट आपल्या कानी पडली, किंवा आपण पहिली तर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
काही नोंदी पुढीलप्रमाणे:-
  1. फाल्गुन वा|| २ मौणे दोडज तालुके निरथडी येथे वोढ्यात करंगलीएवढा रक्ताचा झरा चार घटका वाहिला म्हणून गांवकरी यांनी रा. नारो अप्पाजी(तुळशीबागवाले) जिल्हेदार यास अर्जदस्त पाठविली. (सदर नोंद १७६० सालची आहे)
  2. पुरंदर घेतला आणि निळकंठ महादेव तेथे(सासवडास) गेले होते. तेव्हा गांवजवळ संगमेश्वर देव आहे. तेथील नदीमध्ये विहीरा होता. त्यातील झऱ्यास रक्त येऊ लागले. ते समयी हे स्वतः गेले आणि त्यात अंगवस्त्र टाकिले. ते भिजले तो रक्ताप्रमाणे पाणी! ऐसे तीन दिवस होत होते. 
  3. करमाळे तालुक्यापैकी टेंभुर्णी येथे रा. केशवराव काशिनकर यांचे शेतात एक लिंबाचे झाड आहे. त्याचे वरचे फाट्यातून पौष शु|| ४ मंगळवारी दिवसा १० वाजता आकाशात मोठा आवाज झाला. त्या दिवसापासून सदरचे फाट्यातून पाणी वाहण्यास प्रारंभ झाला आहे. थेंब थेंब सारखे गळत आहे व ते पाणी पहाण्यास पुष्कळ लोक जात आहेत व बाटल्या भरून नेत आहेत. ते पाणी पांढरे असून कडू लागते. त्या झाडापासून रात्री रडल्यासारखा ध्वनि होतो; म्हणून शेतकरी लोक सांगतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. (१८८१ सालची नोंद)
  4. शहादेकर बातमीदार कळवितो की ता. ८ जुलै रोजी दोन प्रहरी शहादे तालुक्यातील हिंगणे गावी रा. पितांबरभाईदास वाणी यांचे शेतात सरासरी २ पांड जमिनीवर विलक्षण मौक्तिक(मोत्यांची) वृष्टी झाली. मोत्याचे दाणे बाजरीच्या दाण्यापेक्षा थोडे मोठे असून, त्यांचा जमिनीवर चांगला पांढरा थर जमला होता. हा चमत्कार गावातील पुष्कळ लोकांनी पाहिला. काही लोकांनी मासल्याकरता मे. कलेक्टर साहेबाकडे काही मोत्ये पाठविली. मोत्यांचा रंग पांढरा शुभ्र चमकदार होता. २-४ दिवसांनी त्या मोत्याचे पापुद्रे गळून पडले. त्या पापुद्र्यांच्या आत काळसर रंगाचा वाटोळा भाग आहे. (१८८१ सालची नोंद)
(टीप:- अंधश्रद्धा वगैरे असला कुठलाही गैरसमज करून न घेणे. त्या लोकांनी जे काही पाहिले किंवा ऐकले ह्यावरून त्या नोंदी केल्या असाव्यात. त्यास आपण आजचे मापदंड न लावलेलेच बरे!)

संदर्भ:- इतिहासातील टेहळणी
           काव्येतिहाससंग्रह

Ⓒ तुषार माने

Comments

Popular posts from this blog

शिवाजी महाराजांचे आरमार

अखेर मातुःश्रींची भेट झाली !

**कर्तव्यकठोर राधाबाई पेशवे**